दिल्ली (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकांच्या निकालात महायुतीला जनतेनं निवडून दिलं. त्यामुळे अधिकच्या जागा ह्या महायुती सरकारच्या आल्या. निकाल जाहिर झाल्यानंतर महायुती सरकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सामील होणार का..? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. काल दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा निवडणूकांचे निकाल जाहिर झाल्यानंतर 4 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदारांची आणि खासदारांची महत्त्वाची बैठक पार पडली होती. ज्यामध्ये आपण सत्तेत समील झाले पाहिजे असा मतप्रवाह सुरू होता. शरद पवार गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व ठेऊन सत्तेत सामील व्हावे असे एका गटाचे म्हणणे होते. तर दुसऱ्या गटाचे अजित पवार गटात सामील होण्याचे म्हणणे होते. मात्र, बहुतांश आमदारांचे सत्तेत सामील व्हावे असेच म्हणणे होते. जर हे सत्यात उतरल्यास महाविकास आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे पुढील काही तासात काय घडेल याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल अदानी यांच्या घरी झालेल्या बैठकीत भाजपच्या केंद्रीय नेत्याने शरद पवार यांच्या गटातील नेत्याकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आगामी काळातील शरद पवार गटाची भूमिका याबाबत माहिती घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.


नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटातील खासदार अजितदादा गटात सामील होतील, अशी चर्चा सुरु होती. मात्र, शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. जर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भाजपसोबत सत्तेत सामील झाला तर महाराष्ट्रातील राजकारणेचे पुर्ण चित्रच पालटून जाईल.