कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : मंदिरांचे आर्थिक व्यवस्थापन, धार्मिक उत्सव यांसाठी राजे महाराजे यांच्यासह भाविक-भक्त यांनी देवस्थानांना शेतजमिनी दान दिल्या होत्या, तसेच तत्कालीन मंदिर व्यवस्थापनानेही काही जमिनी खरेदी केल्या होत्या. या शेत जमिनीपैकी इमान असलेल्या शेत जमिनीची भूधारणा पद्धती भोगवटादार वर्ग -2 असल्याने त्या जमिनीचे कोणतेही बेकायदेशीररित्या हस्तांतरण करता येत नाही. असे असतांना शेत जमिनीच्या कब्जेदारांकडून आणि भूमाफियांच्या हस्तक्षेपामुळे स्थानिक महसूल प्रशासनाच्या मदतीने या शेतजमिनींवरील संस्थानचे नाव बेकायदेशीररित्या कमी करून बर्याच जमिनी हडप करण्यात आल्या आहेत.
त्या संदर्भात दोषींवर कारवाई करण्यासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग अॅक्ट’ लागू करण्यात यावा, या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हा प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वीकारले.
या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघांचे कोल्हापूर जिल्हा संयोजक प्रमोद सावंत, सहसंयोजक अभिजित पाटील , अशोकराव गुरव, संजय माळी, उद्धव बाळासाहेब पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे आणि करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक सुनील सामंत, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, विश्व हिंदु परिषदेचे अनिल दिंडे कैलास दीक्षित, संदीप शेटके, सूर्यकांत गुरव उपस्थित होते.