कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातून गेली वीस वर्षे मी मंत्रीपदावर आहे. त्यापैकी केवळ १४ महिनेच मला या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले. असे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ते कोल्हापुरात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना बोलत होते.

यावेळी उपस्थित पत्रकारांनी, ज्येष्ठत्वानुसार तुम्हाला कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळायला हवे होते. वाशिमसारख्या छोट्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले. यावर तुम्ही समाधानी आहात काय, किंवा नाराज आहात काय ? असा प्रश्न विचारला.

यावर मंत्री मुश्रीफांनी, आमच्याकडे श्रद्धा -सबुरी आणि नेत्यावरील निष्ठा आहे. याबाबतच्या माझ्या भावना मी आमचे पक्षनेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुलभाई पटेल यांच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत. ज्यावेळी युतीचे सरकार असते, त्यावेळी अशा घटना घडत असतात. अशावेळी संयमाने घेऊन आपले प्रश्न निकालात काढणे गरजेचे असल्याचे सांगितले.

पालकमंत्री पदांच्या विषयांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपल्या गावी आलेले आहेत. महायुतीमध्ये सगळं आलबेल आहे काय ? असा प्रश्न विचारताच ना. मुश्रीफ म्हणाले, शिर्डी, छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरून मी आज सकाळीच आलेलो आहे. त्यामुळे काय घडलं आहे हे मला माहीत नाही. उपमुख्यमंत्री शिंदे सातत्याने शेतीचा छंद आणि आवडीच्या निमित्ताने आपल्या गावी येतात. मुख्यमंत्रीही दावोसला गेल्यामुळे कदाचित मंत्रिमंडळाच्या बैठका होणार नाहीत म्हणून ते गावी आले असतील.

सहपालकमंत्री हा नवीनच प्रकार सुरू झाल्याकडे लक्ष वेधले असता, ना. मुश्रीफ यांनी, सह पालकमंत्री ही गोष्ट नवीन आहे हे खरे आहे. यापूर्वी त्याच जिल्ह्यात एखादा दुसरा मंत्री असेल तर तो सह पालकमंत्री असायचा. मी मुंबईला परत गेल्यानंतर हा सह पालकमंत्री विषय काय आहे, हे नक्की समजून घेईन असे उत्तर दिले.

साताऱ्यात शिंदे गटाचे दोनच आमदार असताना शंभूराजे देसाई यांना पालकमंत्री पद दिले आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, एकूणच पालकमंत्री पदांच्या वाटपाचे तत्व हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिन्ही नेत्यांनी मिळून ठरवलेले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद जाहीर होऊन त्या नावाची पुन्हा माघार घ्यावी लागली. हे त्यांचे खच्चीकरण म्हणता येईल काय ? तसेच; नाशिकच्या नावालाही स्थगिती मिळाली. याबद्दल विचारले असता ना. मुश्रीफ म्हणाले, जे तत्व ठरले आहे त्यानुसारच व्हायला पाहिजे. तत्त्व बिघडल की अशा घटना होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमधून परत आल्यानंतर हा सगळा प्रश्न मिटणार असल्याचे सांगितले.

पहाटेच्या शपथविधीला अजितदादांनी जाऊ नये, यासाठी आपण आग्रह धरल्याचे धनंजय मुंडे यांनी भाषणात सांगितले. याबद्दल विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, मुंडे हे असे वक्तव्य करीत असताना मी व्यासपीठावरच होतो. पहाटेच्या शपथविधीला जाऊ नये म्हणून त्यांनी अजितदादांना अडविले हे मी पहिल्यांदाच ऐकले. यापूर्वी मी त्यांच्या तोंडून तसे कधीही ऐकलेले नाही.

पालकमंत्री पदाच्या गोंधळावरून महायुतीमध्ये आता फक्त खून करणे बाकी राहिले आहे, या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर ना. मुश्रीफ म्हणाले, संजय राऊत यांच्या या वक्तव्यात काहीही तथ्य नाही. ज्यावेळी युतीचे सरकार असते, त्यावेळी मत- मतांतरे असतात. असे विषय होत असतात. तर बदलापूरप्रश्नी पोलिसांनी अनावश्यक बळाचा वापर ठेवल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. या प्रश्नावर ते म्हणाले, गृहखाते हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे. त्या विषयाची ते योग्य ती दखल घेणार असल्याचे सांगितले.