कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) :पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे पंचगंगा नदीपात्रात पाण्याची पातळी कमी झाल्याने ऐन उन्हाळ्यात शेतातील पिके वाळू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या शिरढोण येथील शेतकऱ्यांनी कुरुंदवाड येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना कोंडून धरले. त्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दस्तगीर बाणदार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

दरम्यान बुधुवारपर्यंत पंचगंगा नदी पात्रात ३० फूट पाणी पातळी न झाल्यास पाटबंधारे अधिकाऱ्यांना पुन्हा कोंडून घालून कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाचे अभियंता शशांक शिंदे तातडीने कुरुंदवाड येथे दाखल झाले. त्यांनी त्वरित रुई आणि सुर्वे बंधाऱ्यातून जादा क्युसेसने पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. तसेच, २३ एप्रिलपर्यंत तेरवाड बंधाऱ्यात किमान ३० फूट पाण्याची पातळी राहील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले.

दरम्यान, कुरुंदवाड – सोडून दरम्यान सुरु असलेल्या पुलाच्या कामामुळे पाण्याच्या नियोजनात अडथळा येत असल्याचे निदर्शनास आले. यावर संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदारालाही धारेवर धरले. ठेकेदाराने काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले. यावेळी शिरढोणचे सरपंच भास्कर कुंभार, अरुण शिंगे, डॉ. संदीप नागणे, शाहीर बाणदार, अर्जुन बेबडे, अस्लम मुजावर, मोरा भंडारे, सुधाकर खोत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.