नाशिक : नाशिक मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतजमीनिच्या वादातून एका शेतकऱ्याला जीवंत जाळण्यात आलं आहे. या घटनेत वृद्ध शेतकरी ९५ टक्के भाजला असून त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कचेश्वर नागरे (वय ८०) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात जमिनीच्या मालकीवरुन सख्ख्या भावाच्या कुटुंबीयांनीच वृद्धाला अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले. दरम्यान प्राथमिक माहितीनुसार, कचेश्वर नागरे यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबीयांनीच त्यांच्यावर डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले. यानंतर नागरे यांच्या कुटुंबीयांनी जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

या घटनेबाबत कचेश्वर नागरे यांचा मुलगा संजय नागरे यांनी माहिती दिली. गेल्या सात-आठ वर्षांपासून थडी सरोळे गावात नांदूर मध्यमेश्वर चांगदेव महादू नगरे आणि कचेश्वर महादू नागरे यांच्यात शेतीचा वाद सुरु होता. मात्र, माझे वडील कचेश्वर महादू नांगरे आणि आई जिजाबाई नांगरे वयोवृद्ध असून एकटेच राहत होते. माझा भाऊ शेजारी राहत होता, पण तो कामासाठी बाहेर गेला होता. याचाच फायदा घेत माझ्या वडिलांवर डिझेलसदृश पदार्थ फेकून तिकडून पळ काढला, असे संजय नागरे यांनी सांगितले. आता पोलीस याप्रकरणात काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.