कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे कोल्हापूर वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत वाचन संवाद हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी लेखक प्रा.युवराज कदम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी प्रा. युवराज कदम यांनी सांगितले की, अधिकाधिक वाचनामुळे विविधांगी ज्ञान संपादनातून बुद्धीचा विकास होतो. वाचन संस्कृती विकसित झाल्याने कौशल्याधारित शिक्षणात भर पडते. वाचन हा जीवनाचा आधार बनला पाहिजे.साहित्य हे वाचनातून आणि आकलनातून विकसित होत असते. डिजिटलायझेशनमुळे आपल्याला ज्ञान संपादन करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. तरी वाचन संस्कृती टिकून राहण्याची गरज आहे.तरी विद्यार्थ्यांनी वाचनासाठी वेळ देण्याचे आवाहन केले.
प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी, अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तके वाचण्याचा छंद विद्यार्थ्यांनी जोपासायला हवा. वाचनामुळे चौफेर विचार करण्याची सवय लागते. एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी अवांतर वाचनाची सवय महत्त्वाची ठरते.यासाठी वाचन, संवाद आणि लेखक भेट हे उपक्रम पॉलिटेक्निकच्या वतीने आयोजित केले जात असल्याचे सांगितले.
यावेळी पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थी परिणीता वरुटे,समृद्धी मेटील,मंजिरी प्रभावळे,राही पाटील, हर्षवर्धन रणनवरे यांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.
यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, प्रा.चैत्राली कांबळे,प्रा.प्राची चव्हाण, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.