मुंबई – पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी एक घटना घडली होती. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मात्र या घटनेननंतर राजकारणातील वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यावर आता दोन बड्या नेत्यांचा हल्लाबोल सुरु झाला आहे. हे बडे नेते दुसरे तिसरे कुणी नसून काँग्रेस नेते राहून गांधी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू झालाय.
पुण्यातील हिट अँड रन केसवर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत नाराजी वक्त केली आहे. राहुल गांधी म्हणाले, “जर बस, ट्रक, ओला, उबर किंवा रिक्षा चालकाकडून झालेल्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यांना 10 वर्षांचा तुरुंगवास सुनावला जातो. मात्र 16 ते 17 वर्षांचा श्रीमंत कुटुंबातील मुलगा जेव्हा दोघांचे प्राण घेतो तेव्हा त्याला निबंध लिहायला सांगितलं जातं. ट्रक आणि ओला चालकांना का नाही अषी निबंध लिहिण्याची शिक्षा का दिली जात?” असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. “न्याय हा सर्वांसाठी समान हवा. यासाठीच आम्ही संघर्ष करतोय. आम्ही न्यायासाठी लढत आहोत. श्रीमंत आणि गरीब या दोघांसाठीही समान न्याय हवा,” असं राहुल गांधींनी व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले, पुण्यातील घटनेवर राहुल गांधी यांनी जे विधान केलं आहे, व्हिडीओ रिलीज केला आहे ते राजकारण करण्याचा फार वाईट प्रयत्न आहे. पुण्याच्या घटनेत पोलिसांनी योग्य कारवाई केली. ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाने जो निर्णय घेतला त्यावर आम्हीही आश्चर्य व्यक्त केलं. पोलिसांना पुन्हा अपील दाखल केली आहे. अल्पवयीन मुलाला गाडी देणारा पिता, मद्य देणारे या सर्वांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे माझ्या मते पोलिसांनी सर्व कारवाया केल्या आहेत,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले
फडणवीस पुढे म्हणाले, “पण अशा घटनेचं फक्त राजकारण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही. प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणं आणि राजकारण करणं योग्य नाही. त्यांनी जर नीट माहिती घेतली असती तर असं विधान केलं नसतं,” अशी टीकाही त्यांनी केली. तसंच अग्रवाल कुटुंबाच्या छोटा राजन कनेक्शनबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले, “जे काही कनेक्शन असतील त्यांची चौकशी होईल. त्यांच्या प्रत्येक गोष्टींवर कारवाई केली जाईल”.असे ते म्हणाले