मुंबई : लोकसभेत अखेर आज वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आलं आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं. वक्फ सुधारणा विधेयकावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी या विधेयकाच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या वक्फ संशोधन विधेयकावर प्रतिक्रिया देताना विरोधकांव जोरदार हल्लाबोल केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही या बिलाचे समर्थन करतो. लोकसभेत मांडण्यात आलेल्या वक्फ बोर्ड बिलाची चर्चा सुरू आहे. हे बिल निश्चितपणे पास होईल. तीन तलाक नंतर पुन्हा एकदा या बिलामुळे मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व मिळाल आहे, केंद्र सरकारने पुरोगामी पद्धतीचं पाऊल उचललं आहे. या विधेयकाचा कोणत्याही समाजाच्या धार्मिक आस्थांवर याचा परिणाम होणार नाही. यापुर्वी झालेल्या चुकीच्या गोष्टींमुळे काही लोक त्याचा फायदा घेत आहेत. या बिलामुळे त्यावर टाच येणार आहे. ज्यांची सद्सद्विवेक बुद्धी जागृत आहे असे सर्व या सदस्य समर्थन करतील.
बिलाच्या विरोधात एकही पुरावा किंवा मुद्दा सिलेक्ट कमिटी पुढे विरोधक आणू शकले नाही. विचार करून सर्व सुधारणा करण्यात आले आहेत. विरोधकांनी आपल्या छातीवर हात ठेवून निर्णय केला तर या बिलाच्या समर्थनात निर्णय करतील. विरोधकांना कोणाची तरी लाचारी करायची असेल त्यांचे पाय चाटायाचे असतील तर या बिलाचा विरोध केला जाईल.
शिवसेनेची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. सोयीचे राजकारण आम्ही करत नाही, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालण्याची अजूनही त्यांची इच्छा असेल तर ते या बिलाला विरोध करणार नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातात की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवतात हे आता बघावं लागेल.