दिल्ली : भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम झालेला आहे. भारत सरकारच्यावतीने परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी सहमत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘भारत आणि पाकिस्तानमधील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत दोन्ही देशांनी थेट चर्चा केली. पाकिस्तानच्या डीजीएमओने आज दुपारी फोन केला, त्यानंतर चर्चा झाली आणि शस्त्रसंधीचा निर्णय झाला. इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही’.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही एक्स अकाऊंटवरून ट्विट करत भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचे सांगितले आहे. ट्रम्पने लिहिले की, ‘अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या प्रदीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. कॉमन सेन्स आणि ग्रेट इंटेलिजन्स वापरल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!’. असं त्यांनी सांगितलं आहे.