हैद्राबाद : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबादच्या संध्या थिएटर प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान, थिएटरमध्ये झालेल्या गोंधळात एका 35 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन अटक करण्यात आली आहे.

4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. याविरोधात बुधवारी त्याने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरदरम्यान चेंगराचेंगरीत श्वास गुदमरल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या आठ वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

4 डिसेंबर रोजी घटना घडल्यानंतर 5 डिसेंबर रोजी शहर पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी अल्लू अर्जुनविरोधात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी थिएटर मालकांपैकी एक, थिएटरचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि थिएटरच्या खालच्या बाल्कनीचे प्रभारी या तीन जणांना अटक केली. तर अल्लू अर्जुनने एफआयआर रद्द करण्याची याचिका दाखल करत याचिका निकाली निघेपर्यंत अटकेसह पुढील सर्व कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली होती. थिएटरमधील चेंगराचेंगरीत एम. रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या नऊ वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.