मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हे सर्वश्रुत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दै. सामना’मध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर वारंवार जहरी टीका होत असते. अर्थात, भाजपचे नेतेही वारंवार इतर पक्षांच्या नेत्यांपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना लक्ष्य करतात. मात्र, आज ‘सामना’च्या अग्रलेखात गृहखाते सांभाळणाऱ्या राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यात आले आहे. तसेच राज्य सरकारलाही कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. निमित्त आहे, सुमारे सात महिन्यांनंतर सुरू झालेल्या ‘रेस्टॉरंट’ आणि बारवर मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीचे… त्यामुळे ‘सामना’च्या अग्रलेखातून सरकारला आणि गृहखात्यावर टीका करताना संजय राऊत विसरले का की राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे, असा सवाल राजकीय वर्तुळातून होत आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात ?

“आता ‘रेस्टॉरंट’ सुरू करताच पोलिसांनी हॉटेलवर धाडी टाकायला सुरुवात केली. गोरेगावच्या एका बारमध्ये ११ बारबाला नृत्य करतात. अशातच हा बार उशिरापर्यंत सुरू होता, असं पोलिसांचे म्हणणं आहे. ते खरं आहे, पण हा जो मोठा वर्ग याच व्यवसायावर जगत होता, तो सात-आठ महिन्यांपासून कसाबसा अर्धपोटी अवस्थेत जिवंत राहिला आहे. आता त्यांच्या रोजगार व पोटापाण्याची व्यवस्था सरकार किंवा प्रशासन करू शकेल काय? मुंबई-पुण्यासारख्या शहरांत रोजगार देणारा प्रत्येक व्यवसाय पुढचे सहा महिने चालू राहील, याची काळजी घेतलीच पाहिजे. कायद्याचे पालन कोण किती करतो यावर बोलायचे म्हटले तर अनेकांचे वस्त्रहरण होईल. जगा आणि जगू द्या या मंत्रानेच सगळ्यांना जगविता येईल. तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार असेल तर तसं सांगावे. पांढरपेशे लोक पोटापाण्यासाठी गुन्हेगारीकडे वळत आहेत, ही धोक्याची घंटा सरकारच्या कानावर गेली तरी पुरे,” असाही टोला लगावण्यात आला आहे.