गडहिंग्लज (प्रकाश चोथे) : राज्य आणि केंद्र शासनाच्या ‘अनलॉकिंग’ प्रक्रियेत कोरोनाचा विळखा मात्र दिवसेंदिवस अधिकच घट्ट होतोय. जिल्ह्याच्या वाढत्या आकडेवारीची नोंद देशपातळीवर घेतली जातेय त्यात ‘गडहिंग्लज’ तालुक्याचंही योगदान मोजवंच लागेल. पण गेल्या कांही दिवसांपासून तालुक्यातील इतर सर्व गावांची रोजची बाधितांची होणारी नोंद आणि फक्त शहरातील नोंद याची तुलना केल्यास ‘गडहिंग्लज’ शहराची आकडेवारी निश्चितच चिंता वाढवणारी ठरत आहे.

रोजच्या कोरोनाबाधीत आकडेवारीनुसार आठवडाभरात अनेकदा संपुर्ण तालुक्यातील रूग्णसंख्येपेक्षा फक्त शहरातील रुग्णसंख्या जास्त आढळली आहे. आजपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ६३१ असून गडहिंग्लज शहराची संख्या ३२४ इतकी आहे. ९० ग्रामपंचायती आणि त्यांची सुमारे २ लाखाहून अधिक लोकसंख्या यांच्या तुलनेत एका शहराची ही वाढ अनेक अर्थाने विचार करायला लावणारी आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार ११३ व्यक्ती या थेट बाधीत क्षेत्रातून आलेल्या तर त्यांच्या संपर्कातून बाधा झालेल्या ५० स्थानिकांना अशा १६३ बाधितांना वगळले तर ७९२ व्यक्ती या स्थानिक संसर्गाचा शिकार झाल्या आहेत.

स्थानिक संसर्ग रोखण्यासाठी बाधीत रुग्णाचे तात्काळ अलगिकरण आणि त्याच्यावर उपचार हीच गुरुकिल्ली मानून प्रशासन व आरोग्य यंत्रणा काम करीत आहे. मात्र गेल्या कांही दिवसांपासून शहरातील कांही अपवाद वगळता ८ ते १० कुटुंबातील सर्वच व्यक्ती बाधीत आढळल्या. गेल्या आठवडाभरात बाधीत आढळणाऱ्या व्यक्ती या प्रथम संपर्कातुन बाधीत आहेत. याचा अर्थ स्थानिक आरोग्य यंत्रणेच्या अलगिकरणाच्या प्रक्रियेस होणारा विरोध, सर्वेक्षण प्रक्रियेचे अपयश, नागरिकांची विरोधी मानसिकता अशी अनेक कारणे शोधता येतील. पण ग्रामपंचायत स्तरावर मात्र प्रशासनाने या सर्व कारणांवर यशस्वीपणे मात केल्याचे आकडेवारीवरून दिसते.

‘शहर’ म्हणजे बाजारपेठ… तालुक्यातील येणारा लोकांचा लोंढा… पसारा मोठा… हे सगळं जरी खरं असलं तरी फक्त शहराची बाधित संख्या पूर्ण तालुक्यातील बाधितांच्या संख्येपेक्षा निम्याहून अधिक आहे, हे ही खरं आहे. यावर स्थानिक आरोग्य यंत्रणा आपल्यापरीने उपाययोजना करेल पण नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखायला हवी. लक्षणे आढळताच उपचारासाठी समोर येणं आणि कुटुंबातील लोकांना समोर आणणे हाच सध्या एकमेव पर्याय सर्वांसमोर आहे.