कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ठिकठिकाणी दोन दिवसांपासून तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने खरीप
पिकांच्या काढणीला गती आली आहे. सोयाबीन काढणीची धांदल सुरू आहे. यामुळे गावांगावांतील शिवारे पुन्हा एकदा गर्दीने फुलून जात आहे.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी आठ पर्यंतच्या चोवीस तासात हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, करवीर, कागल, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा तालुक्यात पाऊस झाला नाही. पण तीन महिने झालेल्या पावसामुळे लहान, मोठी धरणे भरली आहेत. राधानगरी धरणात २३३.७८ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. या धरणाच्या विद्यूत विमोचकातून २५० तर अलमट्टी धरणातून १६९२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे, जंगमहट्टी, चिकोत्रा मध्यम प्रकल्प तर दूधगंगा, कुंभी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. उंची कमी असल्याने पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा पाण्याखालीच आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्याने सुरू आहे. जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा दशलक्ष घनमीटरमध्ये असा : तुळशी ९७.८२, वारणा ९७०.१३, दूधगंगा ७१९.१२, कासारी ७८.५७, कडवी ६८.४३, कुंभी ७६.८३, पाटगाव १०५.२४, चिकोत्रा ४३.१२, चित्री ५३.४१, जंगमहट्टी ३४.६५०, घटप्रभा ४३.२०६, जांबरे २३.२३०.